विवाह, ब्रम्हचर्य व सूटपत्र ह्यांविषयी प्रश्न
१ आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; स्त्रीला स्पर्श न करणे हे पुरुषासाठी बरे आहे. २ तरीही व्यभिचार होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला आपली स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला आपला स्वतःचा पती असावा. ३ पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा; आणि त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. ४ पत्नीला तिच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पतीला असतो; आणि त्याचप्रमाणे पतीलाही त्याच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पत्नीला असतो. ५ विषयसुखासाठी एकमेकाला वंचित करू नका, तुम्हास प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास मोहात पाडू नये. ६ पण मी हे संमती म्हणून सांगतो, आज्ञा म्हणून नाही. ७ माझी इच्छा अशी आहे की, सर्व लोक माझ्यासारखे असावेत पण प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वतःचे असे देवापासून दान आहे. एकाला एका प्रकारे राहण्याचे आणि दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारे राहण्याचे.
८ म्हणून मी सर्व अविवाहितांना आणि विधवांना असे म्हणतो की, तुम्ही माझ्याप्रमाणे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे आहे. ९ तथापि जर त्यास संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे; कारण वासनेनी जळण्यापेक्षा लग्न करणे बरे. १० आणि विवाहितांना मी आज्ञा देत आहे, मी नाही पण प्रभू देत आहे की पत्नीने पतीला सोडू नये. ११ पण, जर तिने सोडले तर लग्न न करता तसेच रहावे किंवा आपल्या पतीबरोबर समेट करावा आणि पतीने पत्नीला सोडू नये. १२ पण इतरांना हे प्रभू सांगत नाही, पण मी सांगतो की, जर एखाद्या बंधूची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल आणि त्याच्याबरोबर राहण्यास तिची संमती असेल तर त्याने तिला सोडू नये. १३ आणि एखाद्या स्त्रीचा पती विश्वास ठेवणारा झाला नसेल आणि तिच्याबरोबर राहण्यास त्याची संमती असेल तर तिने त्यास सोडू नये. १४ कारण, विश्वास न ठेवणारा पती पत्नीमुळे पवित्र होतो आणि विश्वास न ठेवणारी पत्नी पतीमुळे पवित्र होते. नाही तर तुमची मुले अशुद्ध असती पण ती आता पवित्र आहेत. १५ पण स्वतः विश्वास ठेवत नसल्यामुळे कोणी सोडून जात असेल तर जाऊ द्या; कारण कोणी बंधू किंवा बहीण अशा बाबतीत बंधनात नाही. पण देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता बोलावले आहे. १६ कारण पत्नी, तू हे कशावरून जाणतेस की, तू आपल्या पतीला तारशील की नाही? किंवा तू, पती, हे कशावरून जाणतोस की, तू आपल्या पत्नीला तारशील की नाही? १७ तर जसे प्रभूने प्रत्येकाला वाटून दिले आहे, जसे देवाने प्रत्येकाला बोलावले आहे, तसे त्याने चालावे आणि ह्याप्रमाणे, मी सर्व मंडळ्यांना आज्ञा देत आहे. १८ सुंता झालेली असता कोणाला विश्वासासाठी पाचारण झाले काय? तर त्याने सुंतेचे चिन्ह काढून टाकू नये. बेसुंता असलेल्या कोणाला विश्वासासाठी पाचारण आहे? त्याने सुंता करून घेऊ नये. १९ कारण सुंता झालेला असणे काही नाही किंवा बेसुंता असणे काही नाही; पण देवाच्या आज्ञांचे पालन करणे हे सर्वकाही आहे. २० ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल त्याने त्याच स्थितीत रहावे. २१ तू दास असता बोलावला गेलास काय? त्याची पर्वा करू नकोस; पण तुला स्वतंत्र होता आले तर त्याचा उपयोग कर. २२ कारण दास असता जो प्रभूत बोलावला गेला तो प्रभूचा स्वतंत्र मनुष्य आहे; त्याचप्रमाणे जो स्वतंत्र असता बोलावला गेला तो ख्रिस्ताचा दास आहे. २३ देवाने तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे, म्हणून तुम्ही मनुष्यांचे दास होऊ नका. २४ बंधूंनो जो ज्या स्थितीत बोलावला गेला आहे त्याने त्या स्थितीत देवाबरोबर रहावे. २५ आता कुमारिकांविषयी मला प्रभूकडून काही आज्ञा नाही; पण, विश्वासू राहता येण्यास ज्याच्यावर प्रभूने दया केली आहे असा मी एक असल्यामुळे मी माझे मत देतो. २६ म्हणून मला वाटते की, आताच्या परिस्थीतीत हे चांगले आहे; म्हणजे जो ज्या स्थितीत असेल तसेच त्याने रहावे हे त्याच्यासाठी चांगले आहे. २७ तू पत्नीला विवाहाच्या वचनाने बांधलेला आहेस काय? तर तू स्वतः मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून सोडविला गेलास का? तर तू पत्नी मिळवण्यास पाहू नकोस. २८ पण तू जर लग्न केलेस तर तू पाप केले नाहीस; आणि कुमारिकेने लग्न केले तर तिने पाप केले नाही; पण अशांना संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील आणि अशा हालअपेष्टा तुम्हास भोगाव्या लागू नयेत अशी माझी इच्छा आहे. २९ पण बंधूंनो मी हे सांगतो की, हा काळ थोडका आहे. आता, ज्यांना स्त्रिया आहेत त्यांना स्त्रिया नसल्यासारखे त्यांनी जगावे; ३० जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे आणि जे विकत घेतात त्यांनी ते आपले स्वतःचे नसल्यासारखे रहावे. ३१ जे या जगाचा उपयोग करतात त्यांनी दुरुपयोग न करणारे व्हावे; कारण या जगाचे स्वरूप लयास जात आहे. ३२ पण तुम्ही निश्चित असावे अशी माझी इच्छा आहे. जो अविवाहित आहे तो प्रभूच्या गोष्टींची, म्हणजे आपण प्रभूला कसे संतुष्ट करावे याची काळजी करतो; ३३ पण जो विवाहित आहे तो जगातल्या गोष्टींची, म्हणजे पत्नीला कसे संतुष्ट करावे याची काळजी करतो. ३४ जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेहि पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करते; पण जी विवाहित आहे ती जगातल्या गोष्टींची, म्हणजे आपल्या पतीला कसे संतुष्ट करावे याची काळजी करते. ३५ हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो, तुमच्यावर बंधन टाकावे म्हणून नाही; पण तुम्ही विचलित न होता प्रभूची सेवा करावी म्हणून सांगतो. ३६ जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेच्या अपमानास कारण होत आहोत, ती उपवर झाली आहे आणि तसे अगत्यच आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे, तो पाप करीत नाही, त्याने लग्न करून घ्यावे. ३७ पण ज्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला, ज्याला कशाची निकड नाही व ज्याची इच्छेवर सत्ता आहे आणि असे ज्याने मनात ठरवले आहे तो चांगले करतो. ३८ म्हणून जो लग्न करून देतो तो चांगले करतो; पण लग्न करून देत नाही तो अधिक चांगले करतो. ३९ विवाहित स्त्रीचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती नियमाने बांधलेली आहे, पण जर तिचा पती मरण पावला तर, केवळ प्रभूमध्ये विश्वासी असल्यास, तिची इच्छा असेल त्याच्याशी विवाहित होण्यास ती स्वतंत्र आहे. ४० पण ती जर अविवाहित राहील तर, माझ्या मते, ती अधिक आशीर्वादित होईल आणि मी मानतो की, माझ्यातही देवाचा आत्मा आहे.