१२
१ “दुष्टान्तातील माणूस म्हणाला, ‘त्या वेळी, महान राजपुत्र (देवदूत) मिखाएल उभा राहील. मिखाएल तुझ्या लोकांचा, यहूद्यांचा प्रमुख आहे, तेव्हा खूप संकटाचा काळ असेल. पृथ्वीवर राष्ट्र निर्माण झाल्यापासून असा काळ कधी आला नसेल, पण दानीएल, त्या वेळी तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे जीवनाच्या ग्रंथात नोंदविली गेली असतील, ते सर्व वाचतील. २ पृथ्वीवरील खूप मृत व पुरलेले उठतील. काहींना चिरंजीवित्व लाभेल पण काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल. ३ ज्ञानी आकाशाप्रमाणे तेजाने चमकून उठतील ज्या ज्ञानी लोकांनी इतरांना योग्य जीवनमार्ग शिकविला, ते सदासर्वकाळ ताऱ्यांप्रमाणे चमकतील. ४ “पण, दानीएला, तू हा संदेश गुप्त ठेव तू खाते बंद करून टाक अंतकाळापर्यंत हे तू गुप्त ठेवले पाहिजेस. खूप लोक इकडे तिकडे सत्यज्ञानाचा शोध घेतील आणि सत्यज्ञान वाढेल.’ ५ मग मला, दानीएलला दोन दुसरी माणसे दिसली एक नदीकाठी माझ्याजवळ उभा होता आणि दुसरा पैलथडीला उभा होता. ६ तागाची वस्त्रे परिधान केलेला माणस नदीच्या पाण्यावर उभा होता. त्या दोघांतला एक त्याला म्हणाला, “ह्या विस्मयकारक गोष्टी खऱ्या व्हायला किती काळ लागेल?” ७ “तागाचे कपडे परिधान केलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या राहिलेल्या माणसाने आपले, उजवा व डावा दोन्ही हात स्वर्गाकडे उंचावले आणि त्याने चिरंतर देवाची शपथ घेऊऩ वचन देताना मी ऐकले, तो म्हणाला तो काळ, एक वेळ, अनेक वेळा, (अ) आणि अर्धावेळेचा असेल. पवित्र लोकांच्या शक्तीचा बीमोड केला जाईल आणि मग या सर्व गोष्टी अखेरीला खऱ्या ठरतील.” ८ “मी उत्तर ऐकले पण मला त्याचा अर्थ खरोखरच कळला नाही म्हणून मी विचारले “महाराज, ह्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्यावर काय होईल.?” ९ “तो म्हणाला, दानीएला तू तुझ्या जीवनाकडे लक्ष दे. संदेश गुप्त ठेवलेला आहे. अंताच्या क्षणापर्यंत तो गुप्तच राहील. १० पुष्कळ लोकांना शुध्द केले जाईल ते स्वत:ला स्वच्छ करतील. पण दुष्ट दुष्टच राहातील. त्यांना ह्या गोष्टी समजणार नाहीत पण सुज्ञांना सर्व समजेल. ११ “ ‘नित्याची होमार्पणे करणे बंद होईल. ह्या वेळेपासून ती भयंकर नाश करणारी गोष्टी घेडेपर्यंतचा काळ हा 1290 दिवसांचा असेल. १२ जो वाट पाहील आणि 1335दिवसांच्या अखेरपर्यंत पोहोचेल,तो खूप सुखी होईल. १३ “दानीएल, तुझ्याबद्दल सांगायचे झाले तर, जा आणि शेवटपर्यंत तुझे जीवन जग. तुला विश्रांती मिळेल आणि अखेरील तू मृत्युलोकांतून उठशील आणि तुला तुझा हिस्सा मिळेल.”‘