१ बाराव्या (अदार) महिन्याच्या तेराव्या दिवशी लोकांना राजाच्या आज्ञेचे पालन करायचे होते. यहुद्यांच्या शत्रूंनी त्यादिवशी यहुद्यांचा पाडाव करण्याचे योजले होते. पण आता परिस्थिती बदलली होती. जे यहुद्यांचा द्वेष करत होते त्या शत्रूंपेक्षा यहुदी आता वरचढ झाले होते. २ आपल्याला नेस्तनाबूत करु पाहणाऱ्या लोकांचा जोरदार प्रतिकार करता यावा म्हणून राजा अहश्वेरोशच्या राज्यातील सर्व ठिकाणचे यहुदी एकत्र आले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द जायची कोणामध्येच ताकद नव्हती. यहुद्यांना ते लोक घारबले. ३ शिवाय, सर्व प्रांतामधले अधिकारी, अधिपती, सरदार, आणि राजाचे कारभारी यांनी यहुद्यांना साहाय्य केले. कारण ते सगळे मर्दखयला घाबरत होते. ४ मर्दखय राजवाड्यातील अतिमहत्वाची व्यक्ती झाला होता. त्याचे नांव राज्यातील सर्वापर्यंत पोचले होते आणि ते सगळे त्याचे महत्व जाणून होते. मर्दखयचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले. ५ यहूद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा त्यांनी मन:पूत समाचार घेतला. ६ शूशन या राजाधानीच्या शहरात यहूद्यांनी पाचशेजणांचा वध करून धुव्वा उडवला. ७ शिवाय त्यांनी पुढील लोकांना ठार केले. पर्शन्दाथा, दलफोन अस्पाथा, ८ पोराथा, अदल्या, अरीदाथा, ९ पर्मश्ता, अरीसई, अरीदय, वैजाथा, १० हे हामानचे दहा पुत्र होते. हम्मदाथाचा मुलगा हामान यहुद्यांचा शत्रूं होता. यहुद्यांनी या सर्वाना ठार केले खरे पण त्यांची मालमत्ता लुटली नाही. ११ राजधानी शूशनमध्ये, त्या दिवशी किती जण मारले गेले ते राजाच्या कानावर आले. १२ तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, “हामानच्या दहा मुलांसकट यहुद्यांनी शूशनमध्ये 500 लोकांना मारले. आता राज्याच्या इतर प्रांतांत काय व्हावे अशी तुझी इच्छा आहे? मला सांग म्हणजे मी तसे करवून घेईन. माग म्हणजे मी तसे करीन.” १३ एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असेल तर शूशनमध्ये यहुद्यांना आजच्यासारखेच उद्या करु दे. हामानच्या दहा मुलांचे देहही स्तंभावर टांगा.” १४ तेव्हा राजाने तशी आज्ञा दिली. शूशनमध्ये तोच कायदा दुसऱ्या दिवशीही चालू राहिला. हामानच्या दहा मुलांना टांगले गेले. १५ अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशनमधील यहुदी एकत्र जमले. त्यांनी शूशनमधल्या 300 जणांना जिवे मारले पण त्यांच्या संपत्तीची लूट केली नाही. १६ त्याच वेळी प्रांतांमधले यहुदीदेखील एकत्र जमले. आपल्या संरक्षणासाठी आपले सामर्थ्य वाढावे म्हणून ते जमले. मग त्यांनी आपल्या शत्रूचा काटा काढला. शत्रुपक्षांपैकी 75000 जणांना त्यांनी ठार केले पण त्यांच्या मालमत्तेमधले काही घेतले नाही. १७ अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी हे घडले चौदाव्या दिवशी यहुद्यांनी विश्रांती घेतली. तो दिवस त्यांनी आनंदोत्सवात घालवला. १८ शूशनमधील यहूदी अदार महिन्याच्या तेराव्या आणि चौदाव्या दिवशी एकत्र आले होते. मग पंधराव्या दिवशी त्यांनी आराम केला. पंधरावा दिवस हा त्यांचा आनंदोत्सवाचा होता. १९ म्हणून गावोगावी आणि खेडोपाडी राहणारे यहुदी अदारच्या चतुर्दशील पुरीम साजरा करतात. त्यांचा सण चतुर्दशीला असतो. त्या दिवशी ते मेजवान्या देतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. २० मर्दखयने जे जे झाले ते सगळे लिहून काढले. मग त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळदूरच्या सर्व प्रांतातील यहुद्यांना पत्रे पाठवली. २१ दरवर्षी अदार महिन्याच्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवशी यहुद्यांना पुरीम साजरा करायला सांगायला त्याने ती पत्रे लिहिली. २२ या दिवशी यहुद्यांनी आपल्या शत्रूचा काटा काढला म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रुपांतर आनंदात झाले. म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रुपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहुद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेटवस्तू द्याव्यात. २३ मर्दखयने त्यांना लिहिल्याप्रमाणे करायला यहूदी तयार झाले. हा उत्सव पुढेही चालू ठेवायला त्यांनी मान्य केले. २४ हम्मदाथाचा मुलगा अगागी हामान सर्व यहुद्यांचा शत्रू होता. त्याने यहुद्यांचा नायनाट करण्याचे कपटी कारस्थान रचले होते. यहुद्यांच्या संहारासाठी त्यांने चिठ्ठी टाकून दिवस ठरवला होता. २५ हामानने असे केले पण एस्तेर राजाशी बोलायला गेली. त्यामुळे त्याने नवीन आज्ञा दिल्या त्या आज्ञांमुळे हामानचे कारस्थान फसले एवढेच नव्हे तर हामान आणि त्याचे कुटुंब यांच्यावर त्यामुळे अरिष्ट कोसळले. त्यामुळे हामान आणि त्याचे पुत्र यांना फाशीच्या स्तंभांवर टांगण्यात आले. २६ त्याकाळी चिठ्टयांना “पुरीम” म्हणत, म्हणून या दिवसाला “पुरीम” नाव पडले. मर्दखयने पत्र लिहून यहुद्यांना हा दिवस साजरा करायला सांगितले. २७ त्यामुळे यहुद्यांनी दरवर्षी हे दोन दिवस सणासारखे साजरे करायची प्रथा सुरु केली. आपल्यावर काय ओढवले होते त्याची आठवण राहावी म्हणून त्यांनी तसे ठरवले. यहुदी आणि त्यांच्याबरोबरचे लोक दरवर्षी हे दोन दिवस न चुकता साजरे करतात. २८ प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसांची आठवण ठेवते. सर्व प्रांतांमध्ये आणि सर्व खेड्यापाड्यांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहूदी कधीही सोडणार नाहीत. यहूद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील. २९ मग अबीहईलची मुलगी राणी एस्तेर आणि यहुदी मर्दखय यांनी पुरीमविषयी एक फर्मान लिहिले. हे दुसरे पत्र ही पूर्णपणे सत्य आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ते फर्मान राजाच्या पूर्ण अधिकारानिशी काढले. ३० राजा अहश्वेरोशच्या राज्यातील 127प्रांतांमधील समस्त यहुद्यांना मर्दखयने पत्रे लिहिली. या सणाने शांतता निर्माण व्हावी आणि लोकांमध्ये परस्पर विश्वास असावा हा सणाचा उद्देश असल्याचे मर्दखयने लोकांना सांगितले. ३१ पुरीम साजरा करायला लोकांना सांगण्यासाठी मर्दखयने ही पत्रे लिहिली. आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हे ही त्याने सांगितले. यहुदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहुद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहुद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजामध्ये हा दोन दिवसांचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणांच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा. ३२ पुरीमचे नियम एस्तेरच्या पत्राने मुक्रर झाले. आणि या गोष्टींची लेखी नोंद पुस्तकात झाली.