१ उज्जीया राजाच्या मृत्यूच्या वर्षीच मी माझ्या प्रभूला पाहिले. तो एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायघोळ पोशाखाने सर्व मंदिर भरून गेले होते. २ देवदूत परमेश्वराभोवती उभे होते. प्रत्येक देवदूताला सहा पंख होते. त्यातील दोन पंखांनी ते चेहरा झाकीत. दोनने पाय झाकीत व उरलेल्या दोन पंखांनी उडत. ३ ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते. ४ त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराची चौकट हादरली नंतर मंदिर धुराने भरून गेले. ५ मी फारच घाबरलो. मी म्हणालो, “हाय रे देवा! आता माझा नाश होणार देवाशी संवाद करण्याइतका मी पवित्र किंवा शुध्द नाही आणि मी ज्या माणसांत राहतो, तीही देवाशी प्रत्यक्ष बोलण्याइतकी शुध्द नाहीत.तरीसुध्दा राजाधिराज, सर्वशक्तिमान परमेश्वराला मी पाहिले आहे.” ६ तेथे वेदीवर अग्नी प्रज्वलित केलेला होता एका सराफ देवदूताने चिमट्याने त्यातील निखारा उचलला. सराफ देवदूत तो निखारा घेऊन माझ्याकडे उडत आला. ७ त्या निखांऱ्याचा स्पर्श त्याने माझ्या तोंडाला केला नंतर तो देवदूत म्हणाला, “हे बघ! ह्या निखाऱ्याच्या स्पर्शाने तुझी सर्व दुष्कृत्ये नाहिशी झाली आहेत. तुझी पापे आता पुसली गेली आहेत.” ८ नंतर मला माझ्या परमेश्वराचा आवाज ऐकू आला. परमेश्वर म्हणाला, “मी कोणाला पाठवू! आमच्यासाठी कोण जाईल?”मग मी म्हणालो, “हा मी तयार आहे, मला पाठव.” ९ नंतर परमेश्वर म्हणाला, “जा आणि ह्या लोकांना सांग: ‘काळजीपूर्वक ऐका पण समजून घेऊ नका. काळजीपूर्वक पाहा पण शिकू नका.’ १० लोकांना गोंधळात टाक, लोक जे ऐकतील आणि पाहतील ते त्यांना समजणार नाही असे कर. तू असे केले नाहीस तर कदाचित् लोक जे कानांनी ऐकतील आणि डोळ्यांनी पाहतील, तेच खरे समजतील. असे जर झाले तर ते मला शरण येतील आणि बरे होतील.” ११ नंतर मी विचारले, ‘प्रभू, मी हे असे किती दिवस करू?’ परमेश्वर उत्तरला, “लोक पळून जाऊन शहरे निर्जन होईपर्यंत, आता भरलेली घरे निर्मनुष्य होईपर्यंत, किंबहुना ही सर्व भूमी उजाड व वैराण होईपर्यंत तू असे कर.” १२ परमेश्वर लोकांना दूर पळवून लावील ह्या देशात खूप मोठी ओसाड जमीन तयार होईल. १३ पण लोकसंख्येचा दहावा हिस्सा ह्या भूमीवर राहतील. त्यांचा नाश होणार होता तरीही ते परमेश्वराकडे परत येतील. हे लोक एलाच्या झाडाप्रमाणे असतील. एलाचे झाड कापले तरी बुडखा शिल्लक राहतोच. हे राहिलेले लोक त्या बुडख्याप्रमाणे असतील. हे लोक खास बीज म्हणजेच देवाची लाडकी लेकरे असतील.