१७
१ दमास्कसला हा शोक संदेश आहे. परमेश्वर म्हणतो की पुढील गोष्टी दमास्कसला घडतील.“आता दमास्कस एक शहर आहे. पण त्याचा नाश होईल. फक्त पडझड झालेल्या इमारती तेथे शिल्लक राहतील. २ लोक अरोएराची शहरे सोडून जातील. त्या ओसाड शहरांतून शेळ्यामेंढ्यांचे कळप मुक्तपणे हिंडतील. त्यांना हाकलायला तेथे कोणी माणूस नसेल. ३ एफ्राइमची (इस्राएलची) किल्ले असलेली शहरे नष्ट होतील. दमास्कसचे सरकार पडेल. इस्राएलला जे घडले तेच सिरीयात घडेल. सगळी प्रतिष्ठित माणसे दूर केली जातील.” सर्वशक्तिमान परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे ह्या गोष्टी घडतील. ४ त्या वेळी याकोबाची (इस्राएलची) सर्व संपत्ती नष्ट होईल. आजारी माणसाप्रमाणे याकोब दुबळा व बारीक होईल. ५ एफ्राइम खोऱ्यातील धान्याच्या मोसमाप्रमाणे तो काळ असेल. मजूर शेतात पिकलेली पिके कापून गोळा करतात. नंतर कणसे तोडून ते धान्य गोळा करतात. ६ तो काळ जैतूनच्या मोसमाप्रमाणेही असेल. लोक झाड हलवून जैतूनची फळे पाडतात. पण काही झाडावर राहतातच. उंचावरच्या फांद्यावर चार-पाच फळे राहून जातातच. ह्या शहरांचेही असेच होईल. सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले आहे. ७ त्या वेळी लोक देवाकडे म्हणजे आपल्या जन्मदात्याकडे पाहतील. त्यांना इस्राएलच्या पवित्र देवाचे दर्शन होईल. ८ लोक, स्वत:च्या हाताने केलेल्या वेद्यांकडे जाणार नाहीत. त्यांनी खोट्या देवांसाठी तयार केलेल्या अशेरा स्तंभाचा आणि धूपाच्या वेद्यांचा ते मान ठेवणार नाहीत. ९ त्या वेळेला किल्ले असलेली सर्व शहरे ओस पडतील. इस्राएलचे लोक येण्याआधी त्या भूमीवर जसे डोंगर आणि जंगले होतीत्याप्रमाणे ती शहरे होतील. पूर्वी इस्राएली लोकांना येताना पाहून तेथे राहणारे लोक पळून गेले. भविष्यात परत एकदा देश ओस पडेल. १० असे घडण्याचे कारण तू तुला वाचवणाऱ्या देवाला विसरलास. देव हे तुझ्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, हे तुझ्या लक्षात राहिले नाही.दूरच्या देशांतून तू चांगल्या जातीच्या द्राक्षवेली आणल्यास तू त्यांची लावणी करशील पण त्या वाढणार नाहीत. ११ एके दिवशी तू द्राक्षवेलींची लागवड करशील, त्या वाढाव्या म्हणून प्रयत्न करशील. दुसऱ्या दिवसापासून त्या वाढूही लागतील पण सुगीच्या काळात तू फळे गोळा करायला जाशील तेव्हा तुला सगळे सुकून गेलेले दिसेल. रोगाने सर्व वेली मरून जातील. १२ समुद्राच्या गर्जनेप्रमाणे येणारा पुष्कळ लोकांचा आक्रोश ऐक. ते मोठ्याने रडत आहेत. लाटा एकमेकीवर आदळून उठणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आक्रोश आहे. १३ लोकांची स्थितीही त्या लाटांप्रमाणेच होईल. देव त्यांची कानउघाडणी करील आणि ते लांबवर धावत सुटतील. लोकांची स्थिती वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटाप्रमाणे होईल. वावटळीत उडून जाणाऱ्या गवताप्रमाणे त्यांची अवस्था होईल. १४ त्या रात्री सर्व माणसे अतिशय भयभीत होतील. उजाडण्यापूर्वी सर्व नष्ट झालेले असेल. त्यामुळे आमच्या शत्रूंना काहीही मिळणार नाही ते ह्या भूमीवर पाय ठेवतील तेव्हा येथे काहीही उरलेले नसेल.