३३
१ “ईयोब, आता माझ्याकडे लक्ष दे. मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक. २ मी आता बोलायला तयार झालो आहे. ३ माझे अंत:करण प्रामाणिक आहे. म्हणून मी प्रामाणिक शब्दच बोलेन. मला जे माहीत आहे त्याबद्दल मी सत्य तेच सांगेन. ४ देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले. मला सर्वशक्तिमान देवाकडून जीवन मिळाले. ५ ईयोब, माझे बोलणे ऐक आणि तुला शक्य झाले तर मला उत्तर दे. माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव. ६ देवासमोर तू आणि मी सारखेच आहोत. आपल्याला निर्माण करण्यासाठी देवाने माती वापरली. ७ ईयोब, माझी भीती बाळगू नकोस. मी तुझ्याशी कडक वागणार नाही. ८ “पण ईयोब, तू जे बोललास ते मी ऐकले. ९ तू म्हणालास, ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही. मी अपराधी नाही. १० मी काही चूक केली नाही तरीही देव माझ्याविरुध्द आहे. देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे. ११ देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले. देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’ १२ “परंतु ईयोब, तू या बाबतीत चुकतो आहेस. आणि तुझी चूक मी सिध्द करुन दाखवेन. का? कारण देवाला कोणत्याही माणसापेक्षा अधिक माहिती असते. १३ ईयोब, तू देवाशी वाद घालत आहेस. देवाने तुला सर्व काही नीट सांगावे असे तुला वाटते. १४ परंतु देव जे काही करतो ते खरोखरच स्पष्ट करुन सांगत असेल. कदाचित् देव निराळ्या रीतीने बोलत असेल आणि लोकांना ते समजत नसेल. १५ देव कदाचित् लोकांशी रात्री ते झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल १६ आणि तेव्हा देवाची ताकीद ऐकून ते खूप भयभीत होत असतील. १७ देव लोकांना चुकीच्या गोष्टी करणे बंद करण्याची ताकीद देतो आणि गर्व न करण्याचेही सांगतो. १८ देव लोकांना मृत्युलोकात जाण्यापासून वाचविण्यासाठी ताकीद देत असतो. देव हे सारे माणसाला नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी करतो. १९ “किंवा एखाद्याला देवाचा आवाज तेव्हा ऐकू येईल जेव्हा तो देवाने केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल. देव त्याला दु:ख देऊन ताकीद देत असतो. तो माणूस वेदनेने इतका तळमळत असतो की त्याची सगळी हाडे दुखतात. २० नंतर तो माणूस खाऊ शकत नाही. तो वेदनेने इतका तळमळतो की चांगल्या अन्नाचासुध्दा त्याला तिरस्कार वाटतो. २१ त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे दिसतात. २२ तो मृत्यूलोकांजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते. २३ “देवाजवळ हजारो देवदूत असतात. कदिचित् त्यांच्याच पैकी एखादा त्या माणसावर लक्ष ठेवून असेल. तोच देवदूत त्याच्याबद्दल बोलेल आणि त्याच्या चांगल्या कृत्यांबद्दल सांगेल. २४ देवदूत त्याच्याशी देयेने वागेल. कदाचित् देवदूत देवाला सांगेल. ‘या माणसाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचव. त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’ २५ नंतर त्या माणसाचे शरीर पुन: तरुण आणि जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा होता तसाच पुन्हा होईल. २६ तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्याला उत्तर देईल. तो माणूस आनंदाने ओरडेल आणि देवाची भक्ती करेल. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल. २७ नंतर तो लोकांना कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी चांगल्याचे वाईट केले. पण देवाने मला जितकी वाईट शिक्षा करायला हवी होती तितकी केली नाही. २८ देवाने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवले. आता मी पुन्हा आयुष्य उपभोगू शकतो.’ २९ “देव त्या माणसासाठी या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो. ३० का? त्या माणसाला ताकीद देण्यासाठी आणि त्याच्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी देव असे करतो असे केल्यामुळे तो त्याचे आयुष्य उपभोगू शकेल. ३१ “ईयोब, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे. ३२ पण ईयोब, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे. ३३ परंतु ईयोब, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.”