१५
मानवी संप्रदाय व येशूची शिकवण
१ तेव्हा यरुशलेम शहराहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, २ “तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.” ३ येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता? ४ कारण देवाने सांगितले आहे की, तुझ्या आई-वडीलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आई-वडीलांबद्दल वाईट बोलतो, त्यास जिवे मारावे. ५ पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते, ते मी देवाला अर्पण केले आहे ६ ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.
७ अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्यांने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो.
८ हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात.
पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
९ आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवतात
आणि व्यर्थच माझी उपासना करतात.
१० तेव्हा लोकांस आपल्याजवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या. ११ जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते.” १२ नंतर शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, “परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणाला कळले काय?” १३ पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोप जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. १४ त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.” १५ पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी हा दाखला स्पष्ट करून सांगा.” १६ “तुम्ही अजूनही असमजदार आहात काय? येशूने त्यांना विचारले. १७ जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग शौचकूपातून बाहेर टाकले जाते. हे तुम्हास अजून समजत नाही काय? १८ परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात. १९ कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. २० मनुष्यास अशुद्ध करणाऱ्या याच गोष्टी आहेत. परंतु न धुतलेल्या हाताने खाण्याने मनुष्य अशुद्ध होत नाही.”
एक परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलगी
२१ नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनाच्या भागात गेला. २२ तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे.” २३ पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्यास विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.” २४ पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवले आहे.” २५ मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.” २६ परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे योग्य नाही.” २७ ती स्त्री म्हणाली, “होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात.” २८ तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला प्राप्त होवो.” आणि त्याचवेळी तिची मुलगी बरी झाली.
२९ नंतर येशू तेथून निघून गालीलच्या सरोवराजवळ आला व येशू डोंगरावर चढून तेथे बसला. ३० मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांस आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले. ३१ मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.
चार हजारांना भोजन
३२ मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवसांपासून माझ्याबरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही आणि त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील.” ३३ शिष्य त्यास म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?” ३४ तेव्हा येशू म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत.” ३५ मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. ३६ मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. ३७ तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात टोपल्या गोळा केल्या. ३८ आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते. ३९ मग समुदायास निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या प्रदेशात गेला.