१९
सूटपत्राविषयी प्रश्न
१ येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो गालील प्रांतातून निघून गेला आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील यहूदीया प्रांतात गेला. २ तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे गेला आणि तेथील अनेक आजारी लोकांस येशूने बरे केले.
३ काही परूशी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र द्यावे काय? ४ येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, ५ आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’ ६ म्हणून दोन व्यक्ति या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तिने त्यांना वेगळे करू नये.” ७ परुश्यांनी विचारले, “असे जर आहे, तर मग पुरूषाने सूटपत्र लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?” ८ येशूने उत्तर दिले, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या स्त्रिया सोडून देण्याची मोकळीक दिली. पण सुरुवातीला सूटपत्र देण्याची मोकळीक नव्हती. ९ मी तुम्हास सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सूटपत्र देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय.” १० मग त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “जर पती व पत्नीमधील परिस्थिति अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल.” ११ येशूने उत्तर दिले, “अशी शिकवण स्वीकारणे प्रत्येकाला शक्य होणार नाही. परंतु ज्यांना ही शिकवण स्वीकारण्याची मोकळीक दिली आहे तेच घेतील १२ कारण आईच्या उदरातून जन्मताच नपुसंक असे आहेत व मनुष्यांनी केले असे नपुसंक आहेत आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुसंक करून घेतले आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने, स्वीकारावे.”
येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो
१३ नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली. येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले. १४ परंतु येशू म्हणाला, “लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.” १५ मुलांवर हात ठेवल्यावर येशू तेथून निघून गेला.
१६ नंतर पाहा, कोणीएक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?” १७ येशूने उत्तर दिले, “काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला सार्वकालिक जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ.” १८ त्याने विचारले, “कोणत्या आज्ञा?” येशूने उत्तर दिले, “खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको. १९ आपल्या आई-वडीलांना मान दे आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी इतरावर प्रीती कर.” २० तो तरुण म्हणाला, “या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे. मी आणखी काय करावे?” २१ येशूने उत्तर दिले, “तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठी संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये.” २२ पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्यास फार दुःख झाले कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला.
श्रीमंतीपासून होणारे तोटे
२३ तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, धनवान मनुष्यास स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. २४ मी तुम्हास सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे.” २५ जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?” २६ येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.” २७ पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडले आणि तुमच्यामागे आलो आहोत; मग आम्हास काय मिळेल?” २८ येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी राजासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा राजासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल. २९ ज्याने ज्याने माझ्यामागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल. ३० पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.