१ मुलांनो, तुमच्या वडिलांच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या. लक्ष दिले की तुम्हाला कळेल. २ का? कारण मी जे सांगतो ते महत्वाचे आहे आणि चांगले आहे. म्हणून माझी शिकवण कधीही विसरु नका. ३ एकेकाळी मी सुध्दा लहान होतो. मी माझ्या वडिलांचा लहान मुलगा होतो. आणि माझ्या आईचा एकुलता एक. ४ आणि माझ्या वडिलांनी मला शिकवले. ते मला म्हणाने, “मी जे सांगतो ते लक्षात ठेव. माझ्या आज्ञा पाळ. म्हणजे तू जिवंत राहाशील. ५ ज्ञान आणि समजूतदारपणा मिळव. माझे शब्द विसरु नकोस. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वाग. ६ ज्ञानापासून दूर जाऊ नकोस. ज्ञान तुझे रक्षण करील. ज्ञानावर प्रेम कर म्हणजे ते तुझे रक्षण करील.” ७ तुम्ही ज्ञान मिळवण्याचा निश्चय करता तेव्हाच ज्ञानाची सुरुवात होते. म्हणून तुमच्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग करुन ज्ञान मिळवा. म्हणजे तुम्ही ज्ञानी व्हाल. ८ ज्ञानावर प्रेम करा म्हणजे ते तुम्हाला मोठे करील. तुम्ही ज्ञानाला महान करा म्हणजे ते तुम्हाला मान मिळवून देईल. ९ ज्ञान तुमच्यासाठी सौंदर्य आणि वैभव यांचा मुकुट आहे. ते तुम्हाला मुक्त करते. १० मुला, माझे ऐक. मी जे सांगतो ते कर म्हणजे तू खूप जगशील. ११ मी तुला ज्ञानाविषयी शिकवत आहे. मी तुला सरळ मार्गाने नेत आहे. १२ तू जर याच मार्गाने गेलास तर तू सापळ्यात अडकणार नाहीस. तू पळू शकशील पण अडखळणार नाहीस. तू ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करशील त्यात सुरक्षित राहाशील. १३ या धड्यांची नेहमी आठवण ठेवा. हे धडे विसरु नका. ते तुमचे जीवन आहे. १४ दुष्ट लोक जो मार्ग आचरतात त्यावरुन जाऊ नका. तसे जगू नका. त्यांच्यासारखे व्हायचा प्रयत्न करु नका. १५ वाईटापासून दूर राहा. त्याच्या जवळ जाऊ नका. त्याच्या जवळून सरळ निघून जा. १६ वाईट लोक कोणते तरी वाईट कृत्य केल्याशिवाय झोपू शकत नाहीत. त्यांना दुसऱ्यांना त्रास दिल्याशिवाय झोप येत नाही. १७ ते दुष्टपणापासून बनवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात. (दुष्टपणा केल्याशिवाय ते राहू शकत नाहीत.) १८ चांगले लोक पहाटेच्या प्रकाशासारखे असतात. सूर्य उगवतो आणि दिवस प्रकाशित आणि आनंदमय होतो. १९ पण वाईट लोक रात्रीसारखे असतात. ते काळोखात हरवून जातात आणि दिसू न शकणाऱ्या वस्तूंना अडखळून पडतात. २० मुला, मी जे सांगितले त्याक़डे लक्ष दे. माझे शब्द लक्षपूर्वक ऐक. २१ तू माझ्या शब्दांना तुला सोडून जायला लावू नकोस. मी सांगतो ते लक्षात ठेव. २२ जे माझी शिकवण ऐकतील त्यांना जीवन मिळेल. माझे शब्द शरीराला आरोग्यासारखे आहेत. २३ तुझ्या हृदयाला काळजीपूर्वक जप. कारण तेथूनच जीवनप्रवाह वाहतात. २४ सत्याला वाकवू नकोस आणि खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगू नकोस. खोटे बोलू नकोस. २५ तुझ्या समोर असलेल्या चांगल्या आणि शहाण्या ध्येयांपासून दूर जाऊ नकोस. २६ तू जे करशील त्या बाबतीत सावध राहा. चांगले आयुष्य जग. २७ सरळ मार्ग सोडू नकोस. चांगला आणि योग्य मार्ग धर पण वाईटा पासून नेहमी दूर राहा.