११
१ काही लोक नीट वजन न करणारा तराजू वापरतात. ते लोकांना फसविण्यासाठी असा तराजू वापरतात. परमेश्वराला असले खोटे तराजू आवडत नाही. पण खरा असलेल्या तराजूमुळे परमेश्वराला आनंद होतो. २ जे लोक गर्विष्ठ आहेत ते बिनमहत्वाचे ठरतील. पण जे लोक विनम्र आहेत ते शहाणेही होतील. ३ चांगल्या, इमानदार लोकांना प्रामाणिकपणा मार्गदर्शन करतो. पण दुष्ट लोक जेव्हा दुसऱ्यांना फसवतात तेव्हा ते स्वत:चाच नाश करुन घेतात. ४ ज्या दिवशी देव लोकांचा न्याय करतो त्या दिवशी पैशाला काही किंमत नसते. परंतु चांगुलपणा लोकांना त्यांच्या मरणापासून वाचवतो. ५ जर चांगला माणूस इमानी असला तर त्याचे आयुष्य सोपे असेल. पण दुष्ट माणसाचा मात्र त्याने केलेल्या वाईट गोष्टीमुळे नाश होईल. ६ इमानी माणसाला चांगुलपणा वाचवतो. पण दुष्ट मात्र त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींच्या सापळ्यात अडकतात. ७ दुष्ट माणूस मेल्यानंतर त्याला आशेला जागा नसते. तो ज्या ज्या गोष्टींची आशा ठेवतो त्या सर्व कवडीमोल असतात. ८ चांगल्या माणसांचा संकटापासून बचाव होईल. आणि ती संकटे दुष्ट माणसांवर येतील. ९ दुष्ट माणूस काहीतरी बोलून लोकांना दुखवू शकतो. पण चांगल्या माणसांचे त्यांच्या शहाणपणामुळे रक्षण होते. १० चांगली माणसे जेव्हा यशस्वी होतात तेव्हा सर्व शहर आनंदी होते. जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा लोक आनंदाने ओरडू लागतात. ११ इमानदार लोक त्यांचे आशीर्वाद देतात तेव्हा शहर मोठे होते. पण दुष्टांचा बोलण्यामुळे शहराचा नाश होऊ शकतो. १२ ज्या माणसाला चांगली समज बुध्दी नसते तो त्याच्या शेझाऱ्याबद्दल वाईट बोलतो. परंतु शहाण्या माणसाला केव्हा गप्प बसायचे ते कळते. १३ जो माणूस दुसऱ्या लोकांबद्दल काही गुप्त गोष्टी सांगतो तो गुप्तता पाळत नाही. (म्हणून त्याच्यावर विश्वास टाकणे शक्य नसते.) पण जो माणूस विश्वासू असतो तो अफवा पसरवत नाही. १४ कमजोर नेत्यांमुळे देश गर्तेत जातो. पण बरोच चांगले उपदेशक असले तर तो देश सुरक्षित असतो. १५ जर तुम्ही दुसऱ्या माणसाचे कर्ज फेडण्याची हमी घेतलीत तर तुम्हाला त्या बद्दल पश्चात्ताप करावा लागेल. पण जर तुम्ही त्याला तसे व्यवहार करायला नकार दिलात तर तुम्ही सुरक्षित राहाल. १६ .दयाळू आणि कोमल स्त्री आदराला पात्र होते. जे लोक जुलमी आहेत ते केवळ पैसा मिळवतात. १७ दयाळू माणसाला लाभ होईल. पण जो माणूस उलट्या काळजाचा असतो तो स्वत:वर संकटे ओढवून घेतो. १८ दुष्ट माणूस दुसऱ्यांना फसवतो आणि त्यांचे पैसे घेतो. पण जो माणूस न्याची आहे आणि जो योग्य गोष्टी करतो त्याला फलप्राप्ती होते. १९ चांगुलपणा खरोखरच जीवन आणतो. पण दुष्ट माणसे दुष्टपणाकडे वळतात आणि मरण मिळवतात. २० जे लोक आनंदाने दुष्टपणा करतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो. पण जे लोक योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल परमेश्वर आनंदी असतो. २१ दुष्टांना खरोखरच शासन होईल. ही गोष्ट खरी आहे. आणि चांगल्या लोकांना सोडून देण्यात येईल. २२ जर स्त्री सुंदर असून मूर्ख असली तर ते डुकराच्या नाकात सुंदर सोन्याची नथ असल्यासारखे असते. २३ चांगल्या लोकांना च्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांतून अधिक चांगले निर्माण होते. पण दुष्टांना जर त्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यामुळे संकटेच येतात. २४ जर एखादा माणूस उदारहस्ते देत असेल तर त्याला अधिक मिळेल. पण एखाद्याने द्यायला नकार दिला तर तो गरीब होईल. २५ जो उदार होऊन देतो त्याला लाभ होतो. जर तुम्ही दुसऱ्याना मदत केली तर तुम्हाला अधिक फायदा होईल. २६ जो अधाशी माणूस त्याचे धान्य विकायला नकार देतो त्याच्यावर लोक रागावतात. पण जो माणूस दुसऱ्यांना खायला मिळावे म्हणून आपले धान्य विकतो त्याच्याबद्दल लोकांना आनंद वाटतो. २७ जो माणूस दुसऱ्यांचे भले करायचा प्रयत्न करतो त्याचा लोक आदर करतात. जो माणूस वाईट गोष्टी करतो त्याच्या वाटेला फक्त संकटे येतात. २८ जो माणूस आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पिवळ्या झालेल्या पानासारखा खाली पडतो. परंतु चांगला माणूस नव्या हिरव्या पानाप्रमाणे वाढत राहील. २९ जर एखाद्याने त्याच्या कुटुंबावर संकटे आणली तर त्याला काहीही मिळणार नाही आणि शेवटी मूर्खाला शहाण्या माणसाची जबरदस्तीने सेवा करावी लागेल. ३० चांगला माणूस ज्या गोष्टी करतो त्या जीवनवृक्षासारख्या असतात. शहाणा माणूस लोकांना नवे आयुष्य देतो. ३१ जर पृथ्वीवर चांगल्या माणसांना बक्षीस मिळाले तर दुष्टांनासुध्दा त्याच्या पात्रतेनुसार काही तरी मिळेल.