१६
१ लोक त्यांच्या योजना तयार करतात. पण परमेश्वरच त्या योजना प्रत्यक्षात आणतो. २ माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते. पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो. ३ तुम्ही जे जे करता त्या सगळ्याच्या मदतीसाठी परमेश्वराकडे वळा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. ४ परमेश्वराकडे सगळ्यासाठी योजना आहेत. आणि परमेश्वराच्या योजनेत दुष्ट माणसांचा नाश होईल. ५ जो माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करतो त्याचा परमेश्वर तिरस्कार करतो. परमेश्वर त्या सर्व गर्विष्ठ लोकांना नक्कीच शिक्षा करील. ६ खरे प्रेम आणि इमानदारी तुम्हाला शुध्दकरील. परमेश्वराचा आदर करा म्हणजे तुम्ही वाईटापासून खूप दूर राहाल. ७ जर एखादा माणूस चांगले आयुष्य जगत असेल, परमेश्वराला खुष करत असेल तर त्या माणसाचे शत्रूदेखील त्याच्याबरोबर शांतता राखतील. ८ योग्य मार्गाने थोडेसे मिळवणे हे फसवणूक करुन खूप मिळवण्यापेक्षा चांगले आहे. ९ माणूस त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलच्या योजना करु शकतो. पण काय घडेल ते मात्र परमेश्वरच ठरवतो. १० राजा बोलतो तेव्हा त्याचे म्हणजे कायदा असतो. त्याचे निर्णय नेहमी योग्य असायला हवेत ११ परमेश्वराला सर्व काटे आणि तराजू योग्य असायला हवे असतात. त्याला सर्व व्यापारातील करार न्यायी असायला हवे असतात. १२ राजे लोक वाईट गोष्टी करणाऱ्यांचा तिरस्कार करतात. चांगुलपणा त्याच्या राज्याला मजबूत करील. १३ राजाला सत्य ऐकायचे असते. राजांना खोटे ने बोलणारे लोक आवडतात. १४ जेव्हा राजा रागावतो तेव्हा तो कुणालाही ठार मारु शकतो. आणि शहाणा माणूस राजाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो. १५ राजा जेव्हा आनंदी असतो तेव्हा जीवन सगळ्यांसाठी चांगले असते. राजा जर तुमच्यावर खुष असला तर ते वसंतात ढगातून पडणाऱ्या पावसासारखे असते. १६ ज्ञान हे सोन्यापेक्षा अधिक किंमती आहे. समजुतदारपणा चांदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. १७ चांगले लोक वाईटापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करीत आपले आयुष्य जगतात. जो माणूस जीवनात काळजी घेतो तो आपल्या आत्म्याचे रक्षण करतो. १८ जर माणूस गर्विष्ठ असला तर तो सर्वनाशाच्या संकटात असतो. जर एखादा माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करत असला तर तो पराभवाच्या संकटात असतो. १९ विनम्र राहून गरीब लोकांबरोबर राहणे हे जे लोक स्वत:ला इतरांपेक्षा चांगले समजतात, त्यांच्याबरोबर राहून श्रीमंतीचे वाटेकरी होण्यापेक्षा चांगले असते. २० जर एखादा माणूस लोकांच्या शिकवण्याकडे लक्ष देईल तर त्याचा फायदा होईल. आणि जो माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला आशीर्वाद मिळतो. २१ माणूस शहाणा आहे की नाही ते लोकांना कळेल. आणि जो माणूस अतिशय काळजीपूर्वक आपले शब्द निवडतो तो ज्ञानात भर घालतो. २२ ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या लोकांना ते खरेखरे आयुष्य देते. पण मूर्ख अधिक मूर्ख व्हायला शिकतात. २३ शहाणा माणूस नेहमी बोलण्याआधी विचार करतो आणि तो जे शब्द बोलतो ते चांगले आणि ऐकण्यायोग्य असतात. २४ मायेच शब्द मद्यासारखे असतात. त्यांचा स्वीकार करणे सोपे असते आणि ते प्रकृतीसाठी चांगले असतात. २५ एखादा मार्ग लोकांना योग्य वाटतो. पण तो मार्ग मृत्यूकडे नेतो. २६ कामगाराची भूक त्याला काम करायला लावते. त्याची भूक त्याला खाण्यासाठी काम करायला लावते. २७ कवडीमोल माणूस वाईट गोष्टींच्या योजना आखतो. त्याचा उपदेश आगीप्रमाणे नाश करतो. २८ संकट आणणारे लोक नेहमी समस्या निर्माण करतात. आणि जो माणूस अफवा पसरवतो तो जवळच्या मित्रात समस्या निर्माण करतो. २९ जो माणूस लवकर रागावतो तो त्याच्या शेजाऱ्याला आमिष दाखवून वळवतो. तो त्यांना वाईट मार्गाने नेतो. ३० जो माणूस डोळे मिचकावतो आणि हसतो तो चुकीच्या आणि वाईट गोष्टींच्या योजना आखतो. ३१ जी माणसे चांगले आयुष्य जगली त्यांचे पांढरे केस म्हणजे वैभवाचा मुकुट आहे. ३२ सहनशील असणे हे शक्तिमान सैनिक असण्यापेक्षा चांगले आहे. स्वत:च्या रागाला काबूत ठेवणे हे सबंध शहर आपल्या काबूत आणण्यापेक्षा चांगले आहे. ३३ लोक निर्णय घेण्यासाठी फासे टाकतात. पण निर्णय नेहमी देवाकडून येतात.