१ आणि तिची सासू नामी तिला म्हणाली, तुझे कल्याण व्हावे म्हणून तुजसाठी एखादे स्थळ मला पाहावयास नको काय? २ तर हे पाहा, ज्याच्या नोकरिणीबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला नातलग नव्हे काय? तो आज रात्रीं खळ्यांत सातू उफणणार आहे. ३ तर तूं शुध्द होऊन,सुगंधीत तेल लावून,वस्त्र बदलून खळ्यात जा,पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यत तू त्याच्या नजरेस पडू नको. ४ तो कोठे निजतो ते पाहून ठेव आणि तो निजला म्हणजे तूं जाऊन त्याच्या पायांवरचे पांघरून काढून तेथें निजून राहा. मग काय करावयाचे ते तोच तुला सांगेल. ५ ती म्हणाली, तुम्ही सोगता ते सर्व मी करीन. ६ तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे केले. ७ खाणेपिणे झाल्यावर त्याचे मन प्रलन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या बाजूला झोपला. मग ती गपचूप जाऊन त्याच्या पायांवरचे पांघरून काढून तेथे झोपली. ८ मग मध्यरात्री झाल्यावर तो दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायांपाशी कोणी स्त्री झोपलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. ९ तेव्हा तो तिला म्हणाला , तूं कोण आहेस?ती म्हणाली, मी आपली दासी रूथ आहे,या आपल्या दासीला आपल्या पांघरूणाखाली घ्या.कारण आमचे वतन सोडविण्याचा अधिकार आपल्याला आहे १० तो म्हणाला, मुली, परमेश्र्वर तुझे कल्याण करो, तूं पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखविलास.कारण धनवान किंवा गरीब अशा कोणाहि तुरुणांच्यामागे गेली नाहीस. ११ तर मुली घाबरू नकोस,तूं म्हणतेस तसे मी तु्झ्या संबंधाने करतो. कारण माझ्या गांवच्या सर्व लोकांना माहित आहे की तू सदगुणी स्त्री आहेस १२ मी तुझे वतन सोडवावयास जवळचा नातलग आहे खरा,तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक नातलग आहे. १३ तू रात्रभर येथे राहा,आणि सकाळी तो तुजसंबंधाने नातलगाचे काम करण्यास तयार झाला तर बरेच आहे.त्याला ते करू दे. पण तुझ्यासंबंधाने नातलगाचे काम करण्यास तयार झाला नाही तर, परमेश्र्वराच्या जिवीताची शपथ, तर ते मी करीन.सकाळपर्यत झोपून राहा. १४ ती त्याच्या पायाशी झोपून राहिली, आणि मग माणूस माणसाला ओळखतो त्याच्या अगोदर उठली,कारण बवाजाने तिला सांगितले होते की खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये. १५ तो तिला म्हणाला, तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर. तिने ती पसरल्यावर त्यानें सहा मापे सातू माहून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवले.मग तो गावात गेला. १६ सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, माझ्या मुली, कसे काय झाले? तेव्हा त्या माणसाने कायकाय केले ते तिने तिला सगळे सांगितले. १७ तिने सांगितले की सहा मापे सातू त्याने मला दिले.तो म्हणाला, आपल्या सासूकडे रिकाम्या हाताने जाऊ नको. १८ ती म्हणाली, मुली, या गोष्टींचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यत तूं स्वस्थ राहा. कारण आज तो मनुष्य ह्या गोष्टींचा शेवट लावल्याशिवाय राहावयाचा नाही.